शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आगामी पंचवीस वर्षे भारत देशाचे नेतृत्व हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे पंतप्रधान करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विश्वगुरू बनेल. आता मुस्लिम राष्ट्रात देखील हिंदू संस्कृती वाढीस लागत आहे. तेथे देखील धुपारती केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व चांगले असून देशातील आम्ही संत त्यांच्या पाठीशी आहोत. संतांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा तसेच सर्व मठ आणि मंदिरांना सुरक्षा पुरवावी आणि पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये हिंदू बील पास करावे. लोकसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी प्रलंबित असणारे बिल पास करून देशवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी अनंत विभूषित, धर्म सम्राट, जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरीजी महाराज यांनी केली.
विजयादशमी आणि श्री साईबाबा यांची पुण्यतिथी निमित्त आळंदी रोड येथील श्री साई मंदिरामध्ये मंगळवार ते गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामधे विजयादशमीच्या निमित्त बुधवारी श्री साईबाबा यांची माध्यान्ह आरती अनंत विभूषित धर्म सम्राट जगद्गुरु सूर्या चार्य कृष्णदेव नंदगिरी जी महाराज. पिठाधीश्वर, सूर्यपिठ, मुरली मंदिर, जुना आखाडा, द्वारका, गुजरात यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे आणि भक्त भाविक उपस्थित होते. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना कृष्णदेव नंदगिरी जी महाराज म्हणाले की, मठ, मंदिर, संत, पुजारी यांचे रक्षण करावे त्यांना सुरक्षा द्यावी या संतांच्या मागणीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास आणि आगामी दिवाळीसाठी शंभर रुपयांमध्ये किराणा सामान उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता सरकारने देवदर्शनास, मंदिर खुले करण्यास देखील परवानगी दिली असल्यामुळे सर्वत्र सण, उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे होत आहेत. त्यामुळे देशभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे आगामी काळ हा हिंदुत्वाचा असेल असेही जगद्गुरु सूर्या चार्य कृष्णदेव नंद गिरीजी महाराज यांनी सांगितले.
मंगळवारी पहाटे पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा गुरुवारी सांगता समारोह झाला. यामधे पहाटे ५:३० वाजता मंगल स्नान, साईबाबांची पाद्यपूजा, सकाळी श्रींची आरती, गुरुस्थान येथे रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता गोपाळकाला, माध्यान्ह आरती, धुपारती, साई भजन माला आधी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले अशी माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.