शबनम न्युज | मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांपासून आपल्या गावी गेले आहेत, एकनाथ शिंदे असे अचानक गावी आल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नुकतीच मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही आमदारांना बरोबर घेऊन भाजपाला पाठिंबा देणार असे चर्चा सुरू होत्या, तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. अशा सर्व घडामोडी सुरू असतानाच मुख्यमंत्री गावी जाण्याची कारणे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंच्या नाराजीबाबत विचारले असता, त्यांनी अवघ्या पाच शब्दात उत्तर दिलं.
ते म्हणाले, “तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं” असं फडणवीसांनी अवघ्या पाच शब्दात उत्तर दिलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कर्नाटक दौऱ्यावर गेले होते.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याने ते गावाकडे निघून गेले या तर्कविर्तकाबद्दल विचारले असता, उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावाच्या जत्रेला गेलेले आहेत. गावाच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे, असं कोणी म्हणत असेल तर त्यांचा नागरिक सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.