शबनम न्यूज / पिंपरी
पैसे घेऊन महापालिका हद्दीतील राबविण्यात येणार असलेले पार्किंग धोरण त्वरित थांबविण्यात यावे,अशी मागणी जिल्हा सरचिटणीस, भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा. मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा राजाभाऊ दुर्गे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर गाड्या पार्किंग करण्यासाठी यापुढे सामान्य नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत, असा निर्णय आपल्या अधिकारात घेण्यात आला आहे. महापालिकेचे हे धोरण अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आणि घातक स्वरूपाचे आहे. सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ आहे. गेली दोन वर्ष झाले नागरिक आणि व्यापारी कोरोनाने त्रस्त आहेत. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी लागणार पैसा मिळवण्याचे सगळेच मार्ग बंद झालेले आहेत. सामान्य जनता कोलमडलेल्या या अर्थ व्यवस्थेमुळे पुर्ती हैराण झाली आहे. लोकांची आणि व्यापाऱ्यांची मानसिकता अत्यंत खचलेली आहे. अशा मानसिकतेमध्ये आपण राबविलेले पार्किंगच्या गाड्यांना पैसे देण्याचे हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. सामान्य लोक आणि व्यापारी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तारेवरची कसरत करता करता मेटाकुटीला आलेली असताना आपण राबवित असलेले हे धोरण म्हणजे केवळ आणि केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी महापालिकेने केलेली अधिकृत यंत्रणाच असल्याचे लक्षात येत आहे. अशाप्रकारे पैसे देऊन नागरिकांना पार्किंगची शिस्त लावण्यापेक्षा महापालिकेच्यावतीने पार्किंग सुरळीत होण्यासाठीची यंत्रणा महापालिकेच्या खर्चातुन उभारणे आवश्यक आहे. महापालिकेत राहणारे नागरिक महापालिकेचा कर भरून आपले कर्तव्य बजावत आहेत. असे असताना नागरिकांनी गाडी पार्किंगचे वेगळे पैसे महापालिकेला कशा करता मोजायचे ? शासनाने संचारबंदी सर्वत्र लागु आहे. सर्व व्यवहार सायंकाळी चार वाजताच बंद होत आहेत. असे असताना पार्किंग साठी पैसे उकळण्याचे धोरण राबविणे आपल्याला सुचतेच कसे ? अशा प्रकारे रस्त्यावरच्या पार्किंग साठी नागरिकांकडून पैसे घेणे म्हणजे दिवसा ढवळ्या अधिकृत पणे नागरिकांकडुन खंडणी गोळा केल्या सारखेच आहे.
आयुक्त साहेब अशा चुकीच्या पद्धतीच्या धोरणाला आपण वेळीच थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. आयुक्त साहेब आपण योग्य निर्णय बेधडक पणे घेणारे आयुक्त म्हणून शहरात प्रसिद्ध झाला अहात. आपली शहरात अशी इमेज झालेली असताना आपल्याच कार्यकाळात नागरिकांच्या बाबतीतला इतका चुकीचा निर्णय कसा काय घेतला गेला अशी शंका आपल्या बाबतीत नागरिकांना येऊ शकते. आपल्या काळात नागरिकांना त्रास होईल असं हे पार्किंग धोरण अजिबात राबविले जाऊ नये अशी स्पष्ट मागणी आम्ही या पत्राद्वारे आपणास करत आहोत. लोकभावना लक्षात घेऊन याबाबतीत आपण आगामी सात दिवसाच्या आत हे धोरण रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा लोकांच्या प्रचंड मोठ्या रोषाला आपल्याला भविष्यात सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. असे हि राजाभाऊ दुर्गे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.