लाभार्थ्यांनी मानले महाविकास आघाडी सरकारचे आभार
पिंपरी (दि. 28 जुलै 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एसआरए प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पिंपरी चिंचवड लिंकरोड येथे भाटनगरचा पुर्नवसन प्रकल्प राबविण्यात आला आहे. परंतू न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकल्पातील सदनिकांचे वाटप होऊ शकत नव्हते. त्यानंतर 2019 मध्ये नायालयाच्या आदेशाने प्रकल्प लाभार्थ्यांना देण्याचे निश्चित झाले. तरी देखिल मागिल दोन वर्षांपासून येथिल सदनिकांचे वाटप केले जात नव्हते. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला.
त्यानंतर त्यांनी सदनिकांची सोडत काढून वाटप करण्याचे आयुक्त राजेश पाटील यांना आदेश दिले. अजित पवार यांच्या आदेशामुळेच बुधवारी (दि. 28 जुलै) पिंपरी चिंचवड लिंकरोड प्रकल्पाची सोडत महापौर माई ढोरे यांनी काढली. यामुळे लाभार्थी आनंदीत झाले असून त्यांनी आयोजित केलेल्या या सत्कारामुळे आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांनी केले.
बुधवारी (दि. 28 जुलै) पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने पिंपरी चिंचवड लिंकरोड येथिल एसआरए प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभागात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आली. यानंतर काही लाभार्थी नागरीकांनी एकत्र येऊन डब्बू आसवाणी यांच्या कार्यालयात सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवाणी, माजी नगरसेवक गुरुबक्ष पेहलानी, हरेश आसवाणी या सोडतीसाठी पाठपुरावा करणारे असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांचा लाभार्थी कुटूंबियांनी सत्कार केला व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी अशोक गायकवाड, रामभाऊ डोंगरे, शेखर जगताप, अब्दुल मुलाणी, ज्योती सुर्यवंशी, संगिता पवार, कुसूम झिंझुर्डे, दिलीप गायकवाड, अशोक साबळे, देविदास साबळे, नितीन धेंडे, किशोर तरकसे आदी उपस्थित होते.
यावेळी सुंदर कांबळे यांनी सांगितले की, या प्रकल्पाबाबत सात वर्षे न्यायालयात दावा प्रलंबित होता. जून 2019 ला न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पाची सोडत काढण्यासाठी प्रक्रिया सुरु करणे अपेक्षित असतानाही प्रशासन काही पुढा-यांच्या दबावामुळे सोडत काढत नव्हते.
यानंतर मी असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवाणी आणि माजी नगरसेवक गुरुबक्ष पेहलानी यांच्या बरोबर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले.
यानंतर अजितदादांनी आयुक्तांची कान उघाडणी केली. मधल्या काळात भाजपा पदाधिका-यांनी हि सोडत होऊ नये म्हणून प्रयत्न केले. परंतू अजित पवारांच्या आदेशामुळे आज अखेर प्रशासनाने हि सोडत काढली. उर्वरीत सदनिकांची देखिल सोडत लवकर काढावी अशीही मागणी आपण उद्या शुक्रवारी आयुक्त आणि महापौर यांना भेटून पत्र देऊन करणार आहोत असेही सुंदर कांबळे यांनी सांगितले.
या प्रकल्पात पाच इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारतींमधिल पात्र लाभार्थ्यांची सोडत आज झाली. एका इमारतीमध्ये 269 चौ. फुटांच्या 112 सदनिका आहेत. यापैकी एक सदनिका अंगणवाडीसाठी राखीव आहे. लाभार्थ्यांकडून स्व:हिस्सा भरून घेऊन सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे.