शबनम न्यूज | पुणे
पुणे । प्रतिनिधी
कोरोना संक्रमण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लशींचे प्रमाण वाढवून देण्यात यावे, अशा सूचना नोडल अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कसे वाढवता येईल, यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांचे लशींचे दोन डोस लवकरात लवकार पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना वेळेत दुसरी लस उपलब्ध करून देण्यासही प्राधान्य दिले जात आहे. परंतु केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा होत नसल्यामुळे वेळेत लसीकरण होत नाही. लसीकरण वेळेत व्हावे यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे – राजेश टोपे
कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना संक्रमण राज्यात वाढू नये यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी केले आहे. जगात स्पेन, ब्रिटन,रशिया, इंडोनेशिया अशा देशांमध्ये तिसरी लाट आल्याचे पाहायला मिळाले. या देशात लसीकरणाचे प्रमाण हे साधारण १५ ते २० टक्के इतके आहे. युकेमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे. जिथे लसीकरण जास्त होत आहे तिथे संक्रमणाची व दाहकतेची मात्रा कमी आहे. त्यामुळे सार्वत्रिक लसीकरणासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्राने अधिक प्रमाणात लशींचा पुरवठा केला तर राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.