शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
“आई तु काळजी करू नको, मी पुन्हा तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल. माझ्या बाळाला सांभाळं. त्याची काळजी घे.” अशा शब्दात आपल्या आईला भावनिक साद घालत एका तरुणाने सासुरवाडीच्या लोकांकडून होणाऱ्या छळास कंटाळून आत्महत्या केली.
आत्महत्येपुर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील ह्दयस्पर्शी मजकुराने अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू ओघळले ! तेवढ्यावरच न थांबता त्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्या नावांचा चिठ्ठीत उल्लेख करून त्यांना सासुरवाडीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही केली.
गोखलेनगर येथील निखिल धोत्रे (वय 30) या तरुणाने रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिलचे एक वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर त्याने रविवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये त्याने सासुरवाडीच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे.
निखिलचे त्याच्या कुटुंब आणि मुलावर असणारा अतोनात जीव आणि त्यांच्यापोटी वाटणारी काळजी चिठ्ठीतुन व्यक्त केली आहे. “आई तु काळजी करू नकोस माझी. मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन. आई मी समझून माझ्या बाळाचा सांभाळ कर.त्याची काळजी घे. आई विकास (आग्या) कडे लक्ष दे, त्याची खुप काळजी घे.” असे जन्मदात्या आईकडे आपल्या लेकराच्या सांभाळा करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे.
“मी खुप डिप्रेशनमध्ये आहे. सासुरवाडीच्या लोकांनी मला, माझ्या कुटुंबाला खुप त्रास दिला. वर्षभरापासून सासुरवाडीच्या लोकांनी माझ्याकडून एक लाख 30 हजार रुपये घेतले, मी कर्जबाजारी झालो. माझ्या मृत्युला याच व्यक्ती जबाबदार आहेत. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी माझी सरकारला विनंती आहे.” अशा भावनिक शब्दांत निखिलने थेट मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनाच आर्जव केला आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांनी मला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.