शबनम न्यूज | मुंबई
दलित, शोषित, उपेक्षितांच्या आरक्षणाविरोधात असलेल्या राजकीय पक्षांना अद्दल घडवण्यासाठी बहुजन समाज पार्टी आगामी लातूर महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढवेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी लातूर शहरात आयोजित संवाद यात्रेच्या कार्यक्रमातून केले. शहरात पक्षबांधणी आणि पार्टीविस्ताराच्या अनुषंगाने सकारात्मक वातावरण निर्मितीचे काम संवाद यात्रेने केले आहे. भविष्यात पक्षाला सुगीचे दिवस यावेत याकरिता आतापासूनच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकांच्या तयारीला लागले असल्याचे ते म्हणाले.
पक्षाचे ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास करण्यासाठी बसपा एकमेव पर्याय आहे.आतापर्यंत मुख्यप्रवाहात न आलेल्या समाजाला हात धरून मुख्यप्रवाहात आणून इतर सर्व समाजाला सोबत घेऊन बसपा मार्गक्रम करणार आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांची या सर्व प्रवासात मोलाची साथ मिळत असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले. लातूर शहरात अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शहराअंतर्गत असलेले महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभिकरणाचा मुद्दा प्रलंबित आहे. वारंवार मागण्या, निवेदने देवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पार्कच्या झालेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर बसपा आंदोलन उभारेल, असा इशारा देखील अँड.ताजने यांनी दिला.
शहरातील माता रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून निधी देण्यात आलेला नाही.ही उपेक्षितांची अवहेलना आहे, अशी बसपाची भूमिका आहे. लाभार्थ्यांचे थकित हफ्ते तत्काळ देण्यात यावेत, अशी बसपाची मागणी आहे.उदगीर मध्ये असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बराच जीर्ण झाला आहे. हा पुतळा तत्काळ हटवून त्याठिकाणी नवीन पुतळा स्थापित करण्यात यावा, अशी मागणी देखील अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केली. स्थानिक योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम बसपा कार्यकर्ते करणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी कार्यक्रमातून दिली. सर्वसमावेश विकासासाठी सर्वजनांच्या हितासाठी सर्वांनी त्यामुळे बसपाच्या एकछत्राखाली एकत्रित यावे,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले. कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश सचिव व्यंकट बर्गे, जिल्हा प्रभारी डॉ.बालाजी कांबळे, योगेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रविण जगताप, कोषाध्यक्ष ज्योतिराम लामतुरे, बामसेफ चे नामदेव गायकवाड तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेस काहीही करू शकते – रैना
पंजाबमध्ये सत्तेवर येण्यासाठी दलित समाजातून येणाऱ्या चरनजीत सिंह चन्नी यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्री बनवले आहे. दलितांचे मते मिळवण्यासाठी अवघ्या काही महिन्यांसाठी चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आल्याचा आरोप प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला.कॉंग्रेसला दलितांवर विश्वास नाही. केवळ संकटकाळीच त्यांना दलितांची आठवण येते यामुळे देशातील दलितांना कॉंग्रेस,भाजपासून सावध राहण्याचे आवाहन रैना यांनी केले. ओबीसीबद्दल भाजपकडून दाखवले जाणारे प्रेम बनावटी आहे. भाजपचे ओबीसी बांधवांनावर खरे प्रेम असेल तर जातीनिहाय जनगणना का केली जात नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.