शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले.शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.
ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही.
मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील.
एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
मार्गदर्शक सूचना –
- मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.-
- प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.
- इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.
- ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी.
- सॅनिटायझरचा वापर करावा.
- विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
- गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.
- सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.