शबनम न्यूज | मुंबई (दि.१३ डिसेंबर) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार साहेबांचे अभीष्टचिंतन करत आपले मनोगत व्यक्त केले.
पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आपलं एक मोठं कुटुंब तयार केलं आहे. आज महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पवार साहेबांचे नेतृत्व मान्य करणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे कोट्यवधी कार्यकर्ते आहेत. पवार साहेबांचा ८० वर्षांचा हा प्रवास भल्याभल्यांना थक्क करणारा आहे. अनेक लोक पवार साहेबांच्या राजकीय आयुष्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. काही लोक म्हणतात, साहेब अनप्रेडिक्टेबल आहेत. पण मला एक सांगायचंय की, साहेबांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयाने सामाजिक परिवर्तन महाराष्ट्रात आणि देशात होत असते.
पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला. काही काळ लोकांना गैर वाटलं. पण त्या निर्णयात एका समाजाला न्याय देण्याची भूमिका होती. महिला आरक्षणाच्या निर्णयाबाबत याच नेहरू सेंटरच्या वरच्या मजल्यावर बैठक घेतली होती. पवार साहेबांच्या आग्रहाने देशात पहिल्यांदा ३० टक्के आरक्षण लागू झाले होते. त्यानंतर ५० टक्के आरक्षण महाराष्ट्रात देऊ केले होते. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्याचा नेमही असाच अचूक आहे.
देशात अनेकजण पवार साहेबांचा पॉवर हाऊस असा उल्लेख करतात. नुकत्याच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येऊन गेल्या. देशातील कोणत्याही नेत्याला पवार साहेबांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. दिल्लीत गेल्यानंतरही अनेक नेते पवार साहेबांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. त्यांचा हा प्रवास मोठा आहे. त्यांच्या या प्रवासाकडे बघितल्यानंतर आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते.
पवार साहेब आणि सर्व नेत्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. लोकांसमोर पक्ष अधिक सक्षमपणे न्यायचा असेल तर पवार साहेबांचे नाव घेऊन काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहीजे. त्यांच्याशी आपला संवाद असला पाहीजे. यासाठी गडचिरोलीच्या अहेरी या कोपऱ्यातल्या मतदारसंघापासून आम्ही परिवार संवाद यात्रा सुरु केली. चार टप्प्यात ही यात्रा झाली. २८ जिल्हे आतापर्यंत आम्ही पूर्ण केले असून १० हजार किमीपेक्षा जास्त प्रवास झाला. हा प्रवास करताना जवळपास १८४ विधानसभा मतदारसंघात आम्ही गेलो. जवळपास २२५ बैठका घेतल्या. पश्चिम महाराष्ट्रातले अजून काही जिल्हे बाकी आहेत, तिथेही जाण्याचा मानस आहे. असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पवार साहेबांचे अभीष्टचिंतन करत आपले मनोगत व्यक्त केले. @PawarSpeaks @Jayant_R_Patil #HBDSharadPawarSaheb pic.twitter.com/V2BYrFa1RH
— NCP (@NCPspeaks) December 12, 2021