नवनाथ फडतरे यांचे पुण्यातील मुख्य वनसंरक्षण आधिकार्यांना निवेदन
शबनम न्यूज : पुणे (दि.१७ डिसेंबर) :- पंढरपुर पालखी मार्गावरिल वडकीनाला ,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरात आठ दिवसात तीन बिबट्यांनी तीस -पस्तीस कोंबड्या, चार कुञी, दोन शेळ्या फस्त केल्या आहेत, एका गायवर जीवघेणा हल्ला केला आहे.वडकीनाला परिसरात अक्षरक्षा बिबट्यांनी धुमाकुळ घातला असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले अाहे. तसेच संरक्षणासाठी पिंजरा लावण्याची मागणी वडकी येथील स्थानिक रहिवाशी नवनाथ फडतरे यांनी पुणे विभागातील मुख्य वनसंरक्षण आधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पाठीमागच्या वर्षी देखील याभागात राहणार्या मेंढपाळाच्या मेंढ्या तसेच गायीचे वासरु ही ठार केले होते . पुर्वी एक बिबट्या फिरत होता, आता बिबट्यांची संख्या वाढली आहे. तीन बिबटे आहेत. बिबट्यांची पिलावळ वाढुन भविष्यात या परिसरात राहणार्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वडकी नाला ,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कानिफनाथ गडावर दर्शनासाठी ये -जा करणार्या भक्तांमध्ये सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .वडकीनाला ,गायदरा भागात राहणार्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येणार्या काही दिवसात बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांवर हल्ला होण्याची शक्यता आहे . यापुर्वी ही सबंधित वन प्रशासनाला वारंवार कळविले आहे ,परंतु ,अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी फडतरे यांनी केली आहे.
स्थानिक वनविभाग आधिकारी शेतकर्यांचे ,पाळीव प्राण्याचे व इतर नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत बोलत आहेत, परंतु प्रत्यक्षात पंचनामा करत नाहीत ,नुकसानीची पहाणी ही करत नाहीत , त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे .
येत्या काही दिवसात वनविभागाने कोणतीही दखल न घेतल्यास बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी व इतर नुकसान झाल्यास याची ती सर्व जबाबदारी वनविभागाची राहील असा इशारा नवनाथ फडतरे यांनी वनविभागाला दिला आहे.