शबनम न्यूज : मुंबई (दि.२४ डिसेंबर) :- राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल (२३ डिसेंबर) टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल त्यासोबाबतच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर होणार आहेत.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला.