शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण करुन योग्य पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी आपला परिसर स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याची जबाबदारी स्विकारुन हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी स्वच्छाग्रह मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व रेस्टॉरंट आणि हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्याकरीता स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आणि स्वच्छाग्रह जनजागृती कार्यशाळेचे आयोजन आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील बोलत होते. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेमध्ये पिंपरी चिंचवड हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, स्वच्छ भारत अभियान नागरी प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे उप आयुक्त संदीप खोत, सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, कचरा कधी संपत नाही. शहरात कच-याचे डोंगर उभे राहू नये यासाठी निर्माण होणा-या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असते. महापालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्या दृष्टीने जनजागृतीचे काम करीत आहे. शहर स्वच्छ ठेवत असताना सामुहिक प्रयत्नांची गरज असते. शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे असून याठिकाणी निर्माण होणा-या हॉटेल वेस्टची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी या व्यावसायिकांनी नियोजन करावे. पदपथावर कचरा होणार नाही याची हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी. या शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी स्वच्छाग्रह उपक्रमात सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, सन २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वोत्तम, सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत, पर्यावरणपूरक, राहण्यायोग्य, स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचे महापालिकेने उद्दिष्ट निश्चित केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये या शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा महापालिकेने संकल्प केला आहे. महापालिकेने झिरो वेस्ट शहर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून कच-याची विल्हेवाट लावण्याची आधुनिक यंत्रणा उभारण्याचा प्रकल्प देखील हाती घेतला आहे. प्रकल्पांची अंमलबजावणी झाली म्हणजे शहर सुंदर होईल असे नाही. तर प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग घेतल्यास शहर निश्चितपणे सुंदर होईल. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी महत्वाची असून हॉटेल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक कच-याची विल्हेवाट लावण्याकडे आपण भर दिला पाहिजे. पर्यावरणाची हानी होऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. हॉटेलमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. शहर विकासात हॉटेल व्यावसायिक महत्वाची भूमिका बजावत असून रोजगार उपलब्ध करुन देण्यामध्येही त्यांचा मुख्य हातभार असतो. कोरोना काळात हॉटेल व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम पाहता महापालिका निश्चितपणे हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत सकारात्मक राहील. सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे भर दिला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडील ओला व सुका कचरा, घातक कचरा आणि जैव वैद्यकीय कचरा, सॅनिटरी वेस्ट असे कच-याचे वर्गीकरण करावे. वर्गीकरण करण्यात आलेला कचरा उचलून नेण्यासाठी महापालिकेची यंत्रणा उपलब्ध असेल. स्वच्छाग्रह उपक्रमात हॉटेल व्यावसायिकांनी सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.
संगणकीय सादरीकरणाद्वारे उप आयुक्त संदीप खोत यांनी कार्यशाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान, स्वच्छाग्रह मोहीम तसेच कचरा वर्गीकरणाबाबत माहिती दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींच्या सूचना आणि समस्यांबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मानले.