वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पणजी (दि.१२ फेब्रुवारी) :- प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पणजी येथे बोलताना केली आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने केलेली ही खेळी असल्याची चर्चा सुरू आहे.
ठाकरे म्हणाले की, आम्ही गोव्यात 11 जागा लढवत आहोत. रिपोर्ट येत आहेत. ते फार बोलके आहेत. शिवसेना पहिले हृदयात होती आता घरोघरी पोहोचली आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण घरोघरी गेलंय. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढत असताना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहे. विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचं मॉडल तिथे नेणार आहोत.गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आहे. हेच गुड गव्हर्नन्स मॉडल मुंबईच असो महाराष्ट्राचं असो सर्वच राज्यात नेणार आहोत. शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.