..तर जनता योग्यवेळी आपले मत व्यक्त करेल – जयंत पाटील
शबनम न्यूज : सोलापूर (दि.२३ फेब्रुवारी) :- महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान बुधवारी करमाळा येथे झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडायचे, यासाठी राज्यातील काही जण कार्यरत आहेत. कोणताही संबंध नसताना, कोणतं कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन धाडसत्र, अटकसत्र राबवले जात आहे. हे काही योग्य वाटत नाही, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे. २०१९ च्या काळात भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबावतंत्र वापरले गेले. पण मी खा. शरद पवार यांची साथ सोडली नाही, अशी माहितीही यावेळी जयंत पाटील यांनी दिली. आज आपला पक्ष सत्तेत आहे. आपणही कोणत्याही दबावाखाली न येता आदरणीय पवारसाहेबांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा, आपल्या बुथ कमिट्या ताकदवान करा,असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
आपण सर्वांनी मोठी मेहनत घेऊन अपक्ष म्हणून संजयमामा शिंदे यांना करमाळ्यातून निवडून दिले. आज संजयमामा शिंदे लोकाभिमुख काम या भागात करत आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे, कोविडच्या काळात चांगले काम सरकारने केले तसेच विकासकामात कोणताही खंड पडू नये याची खबरदारी घेतली.करमाळ्यातील पाण्याच्या व्यवस्थेसाठी वारंवार बैठका संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत घेतल्या. येत्या काळात इथले पाण्याचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले.