पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२७ फेब्रुवारी) :- इथल्या संत महात्म्यांनी तसेच साहित्यिकांनी मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी मातीचे सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा जनमानसात रुजवली असून मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करुन या भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नाशिकफाटा बीआरटीएस रोडवरील कल्पतरु सोसायटीजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महापौर माई ढोरे यांनी अभिवादन केले. नागरिकांना महापौर माई ढोरे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, जैवविविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रमोद ओंभासे, प्रेरणा सिनकर, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डाॅ. संजय मेस्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय मेस्त्री यांनी काही निवडक कविता आणि संतांची वचने सांगत मराठी भाषेची महती विशद केली. ते म्हणाले, मराठी साहित्याला संतांच्या उज्ज्वल परंपरेचा सांस्कृतिक वारसा लाभला असून त्या माध्यमातून समाजाला त्यांनी नैतिक शिकवण दिली. तर महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या लेखणीने समाजाचे प्रबोधन केले. कुसुमाग्रज यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मराठी साहित्यातील अग्निसाक्षी ज्वाला संप्रदायाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे . त्यांनी रसिकांच्या मनावर पाच दशकांहून अधिक काळ प्रभाव गाजविला . श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, आस्वादक समीक्षक म्हणून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे नाव अग्रस्थानी आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी कुसुमाग्रज यांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे प्रा. मेस्त्री यांनी सांगितले. राजभाषा असलेली मराठी ही ज्ञानभाषा होऊन मराठी भाषकांची चांगल्याप्रकारे प्रगती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात या भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी तात्यासाहेब शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकातील ‘कोणी घर देता का घर’ हा संवाद सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘सांगा कसं जगायचं’ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर करून गायकवाड यांनी रसिकांची वाहवा मिळवली. ‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं’ आणि ‘कणा’ ही कुसुमाग्रजांची कविताही त्यांनी सादर केली. या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.