शबनम न्युज | ठाणे
“आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमातील भाषणामध्ये आदित्य यांनी हे वक्तव्य केलेलं.
“४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार आहे,” असा दावाही आदित्य यांनी केला. तसेच, “बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हा बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नाही तर माणूसकीशी केलेली गद्दारी आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.