शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यातून महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. राज्यपालांकडून सातत्याने मीठाचा खडा टाकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
राज्यपाल आपल्या बेताल वक्तव्यातून सामाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे पाप ते करत आहेत. आपण सगळेच भारतीय आहोत, त्यामुळे प्रत्येक राज्याचा आणि समाजाचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. विविधतेत एकता ही भारताची पार्श्वभूमी असताना महाराष्ट्रात सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, तिथे मीठाचा खडा टाकून तेढ निर्माण व्हावी असे कटकारस्थान राज्यपाल करत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यपालांच्या वक्तव्यावर तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत स्पष्ट करावे, या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री जाहीर निषेध करतील अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. तसेच सर्व जनतेच्यावतीने या राज्यपालांना ते जिथून आले तिकडे पुन्हा पाठवावे, अशी मागणीही सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, हा राजकीय प्रश्न नसून महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या वागण्यातून आणि शब्दातून महाराष्ट्राप्रती असलेला त्यांचा द्वेष हा सातत्याने दिसून येतोय. या सर्व प्रकरणातून स्पष्ट दिसतेय की भाजप पक्षाला महाराष्ट्राप्रति राग आहे मात्र भाजप काही बोलू शकत नाही म्हणून ते आपली कृती राज्यपालांकडून बोलून दाखवतात, अशी टीका सुळे यांनी केली. तसेच हा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना करणार असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.