शबनम न्युज | पिंपरी
“शिक्षणापासून वंचित असलेल्यांनी खऱ्या अर्थाने भारत घडवला आहे!” असे मत ज्येष्ठ समाजसुधारक आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ रिजन ३ आणि ४ आयोजित शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सुमारे साठ शिक्षकांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि ज्ञानेश्वरीतील सातव्या अध्यायाची प्रत प्रदान करून गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब प्रांतपाल राजेश कोठावदे अध्यक्षस्थानी होते.
तसेच कविवर्य अनंत राऊत, उपप्रांतपाल सुनील चेकर, झोन चेअरमन सुदाम भोरे, सलीम शिकलगार, सुधीर कदम, हृषीकेश देवरे, गणेश शेटे, जॉनी थडानी, अंशुल शर्मा, मिलिंद झगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय लायन्स इंटरनॅशनलच्या सुमारे बत्तीस क्लबचे पदाधिकारी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. मुख्य आयोजक मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. सुनील चेकर यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित संज्ञांची माहिती दिली. अनंत राऊत यांनी ‘मायबाप’ , ‘बाई’ आणि ‘मैत्री’ या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुनीता भोसले यांनी सन्मानार्थींच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर हे इंग्रजीला ‘पुतनामावशीचे दूध’ असे म्हणत असत; परंतु आज इंग्रजीच्या अतिरेकाने भारताचा ‘इंडिया’ होऊ लागला आहे. ‘अविद्येने अनर्थ केले…’ असे महात्मा फुले यांनी म्हटले होते. ज्यांनी परमेश्वराचे दर्शन घडविले तो गुरू, असे कबीर म्हणत असत; कारण कबीर हे रस्त्यावरचे शिक्षक होते.
मात्र आपल्या काही परंपरांनी परमेश्वराची मूर्ती घडविणाऱ्यांना मंदिराबाहेर ठेवले; तसेच त्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले. वास्तविक आदिवासी, वंचित, शोषित हे समाजाचे घटक ज्ञानसंपन्न आहेत; कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांचे ज्ञान कलाकौशल्यांवर आधारित आहे. त्यामुळे जेव्हा या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडले जाईल तेव्हाच पुन्हा वैभवशाली भारत उभा राहील!” राजेश कोठावदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लायन्स क्लबला सेवाभावाची संधी द्यावी, असे आवाहन केले. मुरलीधर साठे, दिलीपसिंह मोहिते, सुदाम मोरे, राजीव कुटे, सुवर्णा तापकीर, जयश्री साठे, पुरुषोत्तम सदाफुले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले व प्रा राजीव कुटे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल झोपे यांनी आभार मानले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि ‘वंदे मातरम्’ने सांगता करण्यात आली.