शबनम न्युज | मुंबई
शिंदे सरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली. त्याच दिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली, मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे हे शिंदे सरकार फक्त घोषणा सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे दिनांक १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणुका यावर चर्चा होणार असल्याची माहिती महेश तपासे यांनी दिली.
राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणुकीची सविस्तर माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्ष कोरोना काळात ही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्याची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यानुसार दिनांक १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे विस्तारीत कार्यकारिणीची सभा होणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबरला तालकटोरा मैदानावर पक्षाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. महाराष्ट्रात काही अडचणींमुळे सभासद नोंदणीसाठी आणखी कालावधी लागेल. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत राज्यातील नोंदणी वाढवली आहे. त्यानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया होईल. तशी मुदतवाढ केंद्रीय समितीने दिली असल्याचे हेमंत टकले यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच विद्यार्थी व युवक यांना बोलावण्यात आले आहे. यानंतरची चळवळ ही युवक व विद्यार्थी यांच्यामार्फत गतीशील केली जाणार आहे, असेही हेमंत टकले यांनी स्पष्ट केले.