विरोधी पक्षेनेते अजित पवार यांची माहिती
शबनम न्युज | मुंबई
राज्यात यंदा पावसाळी हंगामात आणि परतीच्या पासवामुळे झालेले खरीप आणि आगामी रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा अंदाज पाहता मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सतर्क होण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधासभा विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी केली. मंगळवारी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध महत्त्वपूर्ण विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. पासवामुळे पिकांचे नुकसान लक्षात घेऊन विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात यावर विरोधकांकडून आवाज उठविण्यात आला तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या पिकावर परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. त्याशिवाय याचा परिणाम रबी हंगामावरही झाला आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत देण्याचे जाहीर केले असतानाही शेतकऱ्यांना ती मदत अजूनही मिळालेली नाही. यासंबंधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या विषयी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर संपूर्ण जलमय झाले असल्याची माहिती समोर येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील दक्षिणेकडील भागात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. यातून पुन्हा दिवाळीच्या तोंडावर चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्या भागातील लोकांना सतर्क करून तिथे योग्य नियोजन करावे. तसेच धरणाचे पाणी सोडत असताना नदी काठच्या गावांना धोका होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले असले तरीदेखील सत्ताधारी लोकप्रतिनीधींना अधिकाऱ्यांशी अथवा जनतेशी कसे बोलावे याचे थोडेही तारतम्य नाही, असे अजितदादांनी ताशेरे ओढले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही गोष्ट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का असा प्रश्न त्यांनी केला. तसेच अर्वाच्च भाषेत केलेल्या मंत्र्यांच्या संभाषणाची चौकशीही करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली असताना नुसत्या भरतीच्या घोषणा होत आहेत. राज्यातील तरूण वर्ग या भरतीकडे आशेने बघतोय. विशिष्ट खात्याचे मंत्री अशा पद्धतीने तरूणांशी संभाषण करत असतील तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे असे ते म्हणाले. सत्तेत आले म्हणजे कायदा हातात घेण्याचा अधिकार लोकप्रतिनीधींना कोणीही दिलेला नाही, अशी टीका अजित यांनी केली.