शबनम न्युज | चिंचवड
गेल्या चार महिन्यांत राज्यात आपले सर्वसामान्यांचे सरकार आहे. मनात कोणतीही अढी न ठेवता काम सुरू आहे. अनेक जनहिताचे निर्णय घेतले. बदला घेण्यापेक्षा बदल घडविण्यास प्राधान्य दिले, बदला घेण्याऐवजी बदल घडविण्याचा विचार जे करतात, तेच उंची गाठतात, माझ्या प्रवासात जे भेटले त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जे भेटले नाही तेही भविष्यात निश्चितच भेटतील. पाहतो, सांगतो, करतो, असा माझा स्वभाव नाही. होणारे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे रविवारी व्यक्त केले. ते मराठी पत्रकार परिषद मुंबई संस्थेच्या ४३ व्या अधिवेशनात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, कामगार नेते इरफान सय्यद, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक उपस्थित होते. नाना कांबळे यांनी पत्रकारांच्या मागण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी मनोहर चिवटे पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता एक चळवळ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. अडीच वर्षांपासून मंदावलेल्या विकासाला चालना देत आहे. शेतकऱ्यांना मदत, पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, यासह राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सध्याची मीडिया बदलली आहे…
सध्याची मीडिया ही बदलली आहे, गतिमान झाली आहे, त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी देखील वाढली असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात. पत्रकारांची ही चळवळ खरंच कौतुकास्पद आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांचे काम हे आव्हानात्मक आहे, अशी आव्हाने पेलून आपली जबाबदारी बजावणाऱ्या पत्रकारांचे खरंच अभिनंदन केले पाहिजे. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पत्रकारांनी शासनाबरोबर पूरक अशी भूमिका घेतलेली आहे. अनेक मोठे सामाजिक, आर्थिक विषय असतील, त्यावेळी देखील पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशावेळी राज्याला, देशाला आघाडीवर नेण्यात पत्रकारितेचे योगदान महत्त्वाचे आहे, होते आणि राहील, असा विश्वास आपणा सर्वांना आहे.
पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक राहील..
शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृंताकन करताना पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, बातमी मिळवितांना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकर स्थापन करण्यात येईल, तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असेही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.