शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
“शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यात लक्ष नाही, ग्रामीण भागामध्ये लंपी म्हणून आलेला आजार तिथही यांचं लक्ष नाही, हजारो जनावरं मेली, त्यावरही यांचं लक्ष नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रबोधन शिबीरात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “राज्यात गोवरची खूप मोठी साद आलेली आहे, त्यावरही हे सरकार लक्ष द्यायला तयार नाही, हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला तयार नाही, कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत, मी जेव्हा पालकमंत्री होतो, त्यावेळेस पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये सकाळी ७ वाजता हजर राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेत होतो. तसेच जिथे गरज आहे, तेथे गरज पोचविण्याचे कार्य तत्परतेने आम्ही करत होतो, परंतु आत्ताचे सरकार हे खोके सरकार आहे. हे स्थगिती सरकार आहे, हे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे,” अशी टीका ही यावेळी अजित पवारांनी केली.
“आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले ४० आमदार सांभाळण्यातच वेळ घालवीत आहेत, राज्यात ग्रामीण भागात जनावरांना लंपी रोग झाला आहे, या आजाराने अनेक गाई मरण पावले आहेत. तसेच लहान मुलांना गोवर या आजाराचे प्रमाण वाढत आहे, परंतु या आजारांना आळा घालण्यासाठी सरकार ठोस पावले उचलताना दिसत नाही.” असे ही यावेळी अजित पवार म्हणाले.