शबनम न्युज | मुंबई
सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. हे मी नेहमी सांगतो. आम्ही जे सरकार स्थापन केले ते कायद्याच्या चौकटीत बसून केले. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी सरकार परत आणता आलं असतं, असेही न्यायालयाने म्हटले. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवर ही पलटवार केला आहे.
ते म्हणाले, “नैतिकतेच्या ज्या गोष्टी सुरु झाल्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीला जनतेने बहुमत दिले होते. लोकांना हवे होते ते केले. भाजपासोबत निवडणूक लढविली आणि सत्तेच्या खुर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले, त्यामुळे नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. नैतिकता पाळली असती तर आज शिवसेना-भाजपचं सरकार असतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले, बाळासाहेबांचा पक्ष वाचविला, तुम्ही गहाण ठेवला होता,” असा टोलाही शिंदेंनी लगावला.