शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याचे चौकटीत राहूनच निर्णय घेतला होता, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या आधारावर निकाल आहे. या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही, असे मत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे.
आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आज चित्र वेगळं असतं, असे म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक स्तरातून या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या आधारावर निकाल दिला आहे. या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. अनेकांकडून तर्कवितर्क लावत सरकार जाईल असे सांगितले जात होते. विरोधी पक्षांनी सरकार पडावे म्हणून देव पाण्यात ठेवले होते. परंतु, तसे काही घडले नाही. सरकारला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदे यापुढेही मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करण्याची संधी सरकारला मिळाली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढेही चांगले कामकाज करणार आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्याचा झपाट्याने विकास होईल.” असेही ते म्हणाले.