शबनम न्युज | मुंबई
आमच्या मतांवर तुमचे सुपुत्र निवडून आले आहेत. नैतिकतेने भाजपाच्या मतांमुळे त्यांचा विजयी झाला आहे, स्वतःच्या मुलाला राजीनामा द्यायला लावा, असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
काल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ‘मी नैतिकता म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून अनेक स्तरावरून एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यानंतर आता आशिष शेलार यांनीही नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
ते म्हणाले, “नैतिकता, हिंमत आणि मर्द या तीन शब्दांशी तुमचं प्रेम आहे ना उद्धवजी. मग नैतिकता, हिंमत आणि मर्द यासाठी तुम्हाला आमचा थेट प्रश्न आहे. आमच्या मतांवर तुमचे सुपूत्र निवडून आले आहेत. नैतिकतेने भाजपाच्या मतांमुळे त्यांचा विजय झाला आहे. स्वतःच्या मुलाला राजीनामा द्यायला लावा. मर्द असाल, हिंमत असेल, नैतिकता असेल तर तुमच्या आमदारांना सुपूत्रासहित राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा मग दुसऱ्यांना सल्ले द्या”, असं आशिष शेलार म्हणाले.
तसेच पुढे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्नही विचारले आहेत. “प्रश्न साधा आणि सरळ आहे. तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात हे सरकार अवैध घोषित करायला गेला होता, करू शकलात का? १६ आमदारांना अपात्र करू शकलात का? विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकलात का? राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत, बदलल्या पाहिजेत असं म्हणालात पण हे बदलू शकलात का? पुन्हा तुमचं सरकार स्थापन व्हावं म्हणून कोर्टात गेलात, पण सत्ता स्थापन करू शकलात का? शिंदेंना अवैध ठरवायचं होतं म्हणून कोर्टात गेलात, पण तुम्ही अवैध ठरवलात का? नाही. कोर्टाकडून मिळालेलं उत्तर नकारात्मक असल्याने तुमचा सत्तासरपटूपणा इतक्या वर गेला की गिरा तो भी टांग उपर ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचं धोरण यापेक्षा वेगळं काही नाही”, असंही आशिष शेलार म्हणाले.