शबनम न्यूज | मुंबई
शिंदेंची सत्ता आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्यांने सांगितले की, सहा महिने जातो निधी आणतो आणि परत येतो, महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणे गरजेचे आहे, मी जाऊन या म्हटलं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना मिश्किल टोला लगावला आहे. आज जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, “शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आताच अर्धातासापूर्वी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितलं की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं”, असं म्हणत जयंत पाटील मिश्किल हसले.
तसेच “अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचं समर्थनच केलं पाहिजे. याला विरोध करणं आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं वास्तव्य होतं. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी द्यायचं काम सुरू केलं होतं. ते गाव विकसित झालं आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.