शबनम न्यूज (पिंपरी चिंचवड ) प्रतिनिधी :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्वागत केले. दिघी मॅगझीन चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, सचिन ढोले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, संतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे, संचालिका स्वाती मुळे आदि उपस्थित होते.
आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या मेळ्याचे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यासोबत आज उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करत आणि टाळ – मृदंगाच्या गजरात आलेल्या
या पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांनी स्वागत केले. तसेच काही अंतर पालखी रथाचे सारथ्यदेखील केले.
दिघी मॅगझीन चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त सचिन ढोले, रविकिरण घोडके, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, संतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे, संचालिका स्वाती मुळे आदींनी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.
दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार पेटी, कापडी पिशवी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका तसेच देशी झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. स्वागताच्या ठिकाणी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सर्व अधिका-यांनी अभंगावर ठेका धरला. यामध्ये जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी फुगडीचा आनंदही घेतला.
प्रारंभी, पर्यावरणाचा संदेश देणारी, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘हरितवारी प्लास्टिकमुक्त वारी’ असे फलक हातात धरून वृक्षदिंडी काढण्यात आली. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी झाडे लावणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे, असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. वारक- यांना यावेळी देशी वृक्षांच्या बियांचे पाकीट देखील वाटण्यात आले. दिघी मॅगझीन चौकात फुलांमध्ये साकारण्यात आलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, आकुर्डी येथे मुक्कामी असलेला श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पहाटे पुण्याच्या दिशेने रवाना झाला.