शबनम न्युज | मुंबई
शासन आपल्या दारी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात असल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? असा संताप सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? असा संतप्त सवाल करत महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
शासन आपल्या दारी या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार असून या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा धमकीवजा संदेश पसरवण्यात येत आहे. जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकारच्या या धमकीवर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.