शबनम न्युज | शिरगाव
प्रति शिर्डी शिरगाव मावळ तालुक्यातील पुण्याजवळील हे साईबाबांचे प्रसिद्ध देवस्थान. या शिरगावात भक्तांची येण्या-जाण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या शिरगाव मध्ये पिंपरी चिंचवड शहराकडून जाण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग लगत असलेल्या गहुंजे गावातून एक रस्ता जातो. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते. परंतु हा रस्ता सध्या पावसामुळे अत्यंत वाईट परिस्थितीत आला आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनांना वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनत चालला आहे. या रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांची शेती असते, शेतकरीही या रस्त्यावरून येत जात असतात, त्यांनाही रस्त्यावर आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गहूंजे व शिरगाव या दोन गावांना जोडणारा हा रस्ता वाहतुकीसाठी पावसामुळे उपयोगात येत असल्याने दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याची अशी दुरावस्था झाली असल्याची भावना ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामात प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त केला असता, तर ही अडचण आली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची डागडुज्जी करणे, रस्त्यावर झालेले खड्डे बुजविणे, रस्ते वाहतुकीसाठी उपयोगी असणे आवश्यक असते. याबाबतची सर्व आवश्यक कामे प्रशासनाच्या वतीने केली जात असतात. परंतु गहुंजे व शिरगाव ग्रामपंचायत प्रशासनावतीने या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्यावर जवळच मोठ्या सोसायटी तयार झाल्या आहेत. लोढा सोसायटी, अभिमान सोसायटी याकडे जाणारे, येणारे सोसायटीधारक यांना हा रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डा किती मोठा आहे, याचे अनुमान लावता येत नसल्याने अपघात होत आहेत. गाड्यांचे नुकसान होत आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला शेती असल्याने शेतकऱ्यांनाही हा रस्ता अडचणीचा होत असल्याने रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी गहुंजे व शिरगाव या दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. प्रशासनाने आता तरी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, व हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.