लेखिका | गजाला सय्यद
भारतातील मणिपुर राज्यामधील बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झालंय. या व्हिडिओ मध्ये संतापजनक असे कृत्य करण्यात आल्याचे दिसून आले. मणिपुर मध्ये काही लोकांनी दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंडी काढली, त्यानंतर त्यांच्या सोबत अत्याचार देखील केले. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, “ज्या भारत देशात आपण राहतो, ज्या देशाला भारत मातेची उपमा दिली आहे, त्याच भारत देशात महिलांसोबत अशा घटना घडत आहेत.” हा स्वतंत्र भारत देश असून, सर्वांना समान हक्काने वावरणाऱ्यास इथे स्वतंत्र आहे. पुरुष आणि स्त्रियांना इथे समान हक्क मिळतात, या देशात सर्वांना सन्मानाने वागणूक मिळते का? खरच या देशात महिलांना सन्मान आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण मणिपुर मध्ये घडलेली घटना ही कोणत्याही प्रकारे योग्य नाही. एकीकडे महिलांना समान हक्क देण्याचे, महिलांची रक्षा करण्याचे, महिलांना सन्मान देण्याचे ठरवितात आणि दुसरीकडे असे प्रकरण समोर येतात.
भारतात दररोज महिलांसोबत अत्याचार, बलात्कार, मारहाण, हत्या हे प्रकार घडत असतात. अशात खरच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे का? कारण ज्या देशात महिला, मुली या स्वतंत्र नाहीत, दररोज त्यांना या सर्व समस्या ऐकू येतात, या समस्याना तोंड द्यावे लागते, कोठे ना कोठे दररोज एक ना एक महिलेचा बलात्कार होतो, हत्या होते. हे सर्व घडत असताना महिलांना कोणत्या प्रकारचा स्वतंत्र मिळाला आहे? मणिपुर मध्ये जेव्हा त्या दोन महिलांसोबत असे कृत्य होत होते, तेव्हा विशेष तेथील प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. जेव्हा त्या महिलांसोबत हे कृत्य घडत होते, तेव्हा तेथे राहणारे नागरिक प्रेक्षक बनून पाहत उभे होते. आता या सर्वात चुकी कोणाची? त्या महिलांची की त्या आरोपींची की तेथील प्रेक्षकांची!
विशेष म्हणजे, या बद्दल कोणीही बोलत नाही, भारत देशाला प्रथम क्रमांकावर आणण्याचा यांचा उद्देश आहे, तर या सर्व घटना, प्रकरणांकडे लक्ष द्यायला हवे आहे. राजकीय पातळीवरील नेते आपआपल्या स्वार्थासाठी पद स्वीकारतात, पोलीस प्रशासन देखील या घटनेकडे लक्ष देत नाहीत. आपल्या देशात रोज महिलांवर अत्याचार होतात, काही आरोपींविरुद्ध बोलतात तर काही असेही आहेत जे स्वताच्या बदनामीच्या भीतीने समोर देखील येत नाही आणि ही भयंकर समस्या सहन करतात. आपल्या देशातील पोलीस प्रशासन, राज्य शासन, केंद्र सरकारन देखील या गोष्टींकडे लक्ष देत नाही.मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला आहे, तर हजारो कुटुंबं उद्धवस्त झाली आहेत. वेळीच शासनाने तेथे लक्ष दिले असते तर अशा प्रकारे महिला जातीचा अपमान झाला नसता.
खरं तर, मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ४ मे रोजी जमावाने या दोन पीडित महिलांना नग्न करत धिंड काढली. तसेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. त्याचदिवशी जमावाने २१ वर्षीय पीडित महिलेच्या १९ वर्षीय भावाची हत्या केली होती.
मणिपुर मध्ये नेमके घडले काय –
अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा यावरून ३ मे रोजी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायात हिंसाचार उफाळला. पहाडी प्रदेशात आदिवासी एकता रॅली काढल्यानंतर लगेचच हिंसाचाराला सुरुवात झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित महिला एका लहान गटाचा भाग होत्या. त्यांनी ४ मे रोजी स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी जंगल परिसराकडे पळ काढला होता. दरम्यान, हिंसाचार उफाळल्यानंतर दोन्ही समुदायकडून हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले.
यावेळी एका समुदायाच्या महिलांवर कथित बलात्कार झाल्याच्या अफवेनंतर जमावाने पीडित महिलांच्या गावावर हल्ला केला. तसेच त्यांनी जंगलात सुरक्षेसाठी गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. या गटात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. यातील तिघे एकाच कुटुंबातील होते. ज्यामध्ये एक ५६ वर्षीय व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा आणि २१ वर्षांची मुलगी होती. तर त्यांच्यासोबत आणखी ४२ वर्षीय आणि ५२ वर्षीय अशा दोन महिला होत्या.
हा गट जंगलाच्या दिशेनं जात असताना नॉन्गपोक सेकमाई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस या गटाला घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात असताना सुमारे ८०० ते १००० जणांच्या जमावाने त्यांना आडवलं. त्यानंतर संतप्त जमावाने या गटाला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेतलं. यावेळी १९ वर्षीय भावाने आपल्या २१ वर्षीय बहिणीला जमावाच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने १९ वर्षीय भावाची जागीच हत्या केली. यानंतर जमावाने पीडित महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली.
महिलांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ मे रोजी एफआयआर दाखल केला होता. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेतील महिला पीडितांना न्याय मिळायला हवा, अशी प्रतिक्रिया सर्वच व्यक्त करीत आहेत. मात्र, असे भयंकर अत्याचार होणे कधी बंद होणार? देशातील महिला या कधी स्वतंत्र होतील? महिलांना त्यांचा हक्क, त्यांचा अधिकार, त्यांच्या सोबत झालेल्या अत्याचाराचे न्याय कधी मिळणार? मुली/महिला या स्वतःला सिद्ध करत पुढे जात आहेत, किती तरी अडचणीतून ते स्वतः काहीतरी करत आहेत, यात प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे की, प्रत्येक स्त्री ला सन्मानाने वागणूक देत त्यांची मदत केली पाहिजे त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. हिंदी मध्ये एक वाक्य आहे, “अकेली औरत जिम्मेदारी होती हे मौका नहीं” ही शब्दरचना लक्षात ठेऊन सर्वांनी स्त्रियांची रक्षा करायला हवे, मणिपुर मध्ये घडलेली घटना निषेधात्मक आहेच मात्र, त्या घटनेतील प्रत्येक आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. आता आपण कितीही या घटनेचा निषेध व्यक्त केला तरीही त्या महिलांसोबत जे झालं, त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही. मात्र या प्रकारच्या घटना कोणत्याही स्त्री सोबत कधीही घडणार नाही, याची काळजी या भारतातील नागरिकांनी घेतली पाहिजे.