सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘माझी माती माझा देश’
उपक्रमाचा विश्वविक्रम; ५००० विद्यार्थ्यांची उपस्थिती
‘सूर्यदत्त’मध्ये घडतेय राष्ट्राच्या विकासात योगदान देणारी पिढी
डॉ. गुलशन राय यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘माझी माती माझा देश’ उपक्रम
पंतप्रधानांनी दिलेले ‘पंचप्रण’ कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘माझी माती माझा देश’ उपक्रम
पुणे : केंद्र सरकार, तसेच राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार ‘माझी माती माझा देश’ हे अभियान ‘सूर्यदत्त’मध्ये राबविण्यात आले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार शालेय प्रांगणात शिलाफलक उभारण्यात आले. शाळेतील प्रार्थनेनंतर शहीदांच्या शौर्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चर्चा व्हावी आणि हुतात्मा दिन साजरे व्हावेत, असा यामागे उद्देश आहे. हे अभियान राबवण्याच्या सूचना मिळाल्यानंतर अवघ्या २४ तासात फलक उभारणी करणारी, तसेच पंचप्राण शपथ घेणारी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही पहिली संस्था ठरली.
भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू व देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, या पंचप्रणांची ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शपथ घेण्याचा विक्रमही ‘सूर्यदत्त’च्या नावे नोंदवला गेला आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय, वैद्यकीय सामाजिक सेवेतील डॉ. सुधीर शहा, पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, दिनेश गुप्ता, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यचालन अधिकारी अक्षित कुशल आदी उपस्थित होते.
डॉ. गुलशन राय म्हणाले, “देशातील प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वाच्या जोरावर भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पायाभूत सुविधा, तांत्रिक सुविधा पोहोचत आहेत. आपण सगळेजण एकमेकांशी जोडले जात आहोत. अशावेळी आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवत आपण काम केले पाहिजे. स्वतःसह कुटुंबाची, देशाची सुरक्षितता यावर लक्ष द्यायला हवे. सायबर गुन्हेगारी वाढत असताना आपण सुरक्षिततेचे सर्व नियम दक्षतापूर्वक पाळायला हवेत.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “देशभक्तीची भावना आणि देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊ शकणारी सक्षम पिढी घडविण्याचे काम सूर्यदत्त संस्था गेली २५ वर्षांपासून अव्याहतपणे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हा पंचप्रण कार्यक्रम येत्या काळात प्रभावीपणे राबविण्यावर आमचा भर असेल. भारत आत्मनिर्भर आणि विकसित होण्यासाठी सूर्यदत्त सर्वतोपरी योगदान देईल. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सैनिक, शेतकरी यांच्याप्रती आदरभावना, ऐतिहासिक व समृद्ध वारशाचा अभिमान रुजवण्यासह त्यांना त्यांची कर्तव्य आणि अधिकार याची जाणीव सूर्यदत्तमध्ये नियमितपणे करून दिली जाते.”
मुरलीकांत पेटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशाप्रती आपली समर्पित भावना असायला हवी. कोणत्याही क्षेत्रात काम करताना देशाचे नाव जगात उंचावले जाईल, अशी कामगिरी आपण केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. मातीशी नाते जपण्याची आणि त्याप्रती आदरभावना ठेवण्याचा कायम प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.