कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तत्पूर्वी, ‘डिजिटल युगातील पर्यटन’ या विषयावर झालेला चर्चासत्रात हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र केळशीकर, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, टुरिस्ट गाईड राजिंदर कौर जोहाल व डिजिटल मीडिया अभ्यासक ओवी सातपुते यांनी सहभाग घेतला. डॉ. राजीव घोडे यांनी चर्चासत्राचे संचालन केले. प्रसंगी महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशन अध्यक्ष गणेश चप्पलवार, चित्रपट परीक्षक जुनेद इमाम, महोत्सवाचे व्यवस्थापक असीम त्रिभुवन, माध्यम प्रमुख के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी असे महोत्सव उपयुक्त ठरतात. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, यासाठी प्रोत्साहन मिळेल.”
राजेंद्र केळशीकर म्हणाले, “पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव देते. जबाबदार पर्यटनाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. भारतात अनेक समृद्ध ठिकाणे आहेत, त्याची माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. परदेशातील पर्यटनाचे कौतुक करावेच; पण आपल्या इथे पर्यटनाला जाताना नियमांचे पालन करावे.”
नितीन शास्त्री म्हणाले, “पर्यटन अनेक प्रकारे करता येते. देश, जग फिरल्याने आपण समृद्ध होत जातो. भारताला देशप्रेमाचा, इतिहासाचा मोठा वारसा आहे. देशभक्तीचे अर्थात पॅट्रिऑटिक पर्यटन गेल्या काही वर्षांपासून राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल माध्यमे तरुणांच्या हाती असल्याने त्यांना देशभक्ती कळावी, यासाठी पॅट्रिऑटिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”
सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. गणेश चप्पलवार यांनी आभार मानले.