शबनम न्यूज | प्रतिनिधी :
देहू : :- तीर्थक्षेत्र देहूतील गट नं. ९७ ही गायरान जमीन देहूच्या विविध प्रकल्प व विकासाकामांसाठी तसेच भाविकांच्या सोयी सुविधांसाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याने ती कोणालाही देऊ नये. या गायरान जमिनीचा बचाव करण्यासाठी देहूकारांनी आज शुक्रवारी टाळ मोर्चा काढला. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी संजय असवले आणि अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांसह सर्वानीच कडकडीत बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, नगरसेवक-नगरसेविका, देहूकर ग्रामस्थ, वारकरी, सेवेकरी यांनी महाद्वार चौक मुख्य मंदिरापासून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टाळ वाजवीत दिंडी मोर्चा काढला. १४ टाळकरी कमान मार्गे दिंडी मोर्चा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोर्चेचे सभेत रूपांतर झाले.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, नगरसेवक योगेश परंडवाल, शैलेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कोणतही निर्णय घेण्यापूर्वी देहू नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी व प्रशासन आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त आणि ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.