शबनम न्युज | पुणे
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरु झालेल्या वाचन प्रेरणा दिना निमित्त मनोदय संस्थेच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ विष्णू श्रीमंगले, मैत्रेयी पाध्ये, साक्षी सुतार, काजल रणसुरे आणि गणेश क्षीरसागर हे पदाधिकारी उपस्थित होते. वस्ती पातळीवरील तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जावू नये किंवा त्यातून त्यांनी बाहेर पडावे यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
युवकांमध्ये असणाऱ्या आंतरिक प्रेरणेचा विकास होण्यासाठी वाचन प्रेरणा दिनी मुलांना आणि पालकांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यातून त्याची सवय होईल, या दृष्टीने संपूर्ण वस्तीमध्ये पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात लहान मुलांचा सहभाग सर्वाधिक होता. अवकाश संबंधित पुस्तके, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले आणि रंगीबेरंगी पुस्तके सर्वाधिक हाताळली गेली.
मनोदय संस्थेच्या वतीने वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवले जातात. उदा. विविध वयोगटातील मुलांसाठी त्या वयोगटाप्रमाणे पुस्तके उपलब्ध करून देणे. गोष्ट रंगच्या माध्यमातून गोष्टी रंगवून सांगणे, पुस्तके वाचून झाल्यावर त्यावर मुलांची पुस्तकाबद्दलची मते, अभिप्राय किंवा परीक्षण लिहून घेणे, चित्र काढून घेणे तसेच इतरांना पुस्तकाबद्दल माहिती देणे इ. व्यसनांचा त्या कुटुंबांवर आणि अप्रत्यक्ष संपूर्ण वस्तीला सामाजिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक व भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. तरुणाई यामध्ये कायम धोक्याच्या पातळीवर असते. त्यामुळे व्यसनामुळे होणारे कोणतेही आजार आणि उपचार आपल्याला पूर्णपणे बरे करू शकत नाही परंतु प्रतिबंध आपल्याला धोक्यापासून दूर ठेवतात.
समाजातील जोखीम घटकहे बहुतांश वेळा व्यक्तीच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात, त्यामुळे संरक्षणात्मक घटक वाढवणे किंवा त्यांना मजबूत करणे आवश्यक असते. व्यक्तिगत घटक, व्यक्तिमत्वाचे घटक, वातावरण, कुटुंब, शेजारी, शाळा आणि समाज अश्या विविध स्तरांवर समांतर पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आणि अंमलबजावणी करणे हे महत्वाचे ठरते,असे डॉ.श्रीमंगले यांनी सांगितले.