पिंपरी । प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात पालकांनी मुलांना सुरक्षित न ठेवता स्पर्धेत उतरण्यास तयार करावे. पाण्यात पडल्यावर पोहायला येतेच. त्यामुळे मुलांना यशस्वी झालेले पहायचे असेल, तर त्यांच्याकडे जबाबदारी द्या. त्यांना प्रयत्न करु द्या, असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे (एसव्हीएसपीएम) संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे यांच्या जन्मदिनानिमित्त अनाथ विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, बीजवाटप असे विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विधायक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे देणे लागतो या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भोंगाळे बोलत होते.
यावेळी भोंगाळे कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक उखरडा भोंगाळे, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक कविता कडू- पाटील, खजिनदार विजया भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, विश्वस्त सरिता विखे-पाटील, योगेश एंटरप्राईजेसचे विशेष कार्यकारी अधिकारी योगेश भोंगाळे, श्री संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्ट, श्री संत सदगुरू बाळुमामा ट्रस्ट, अभ्युदय बँकेचे प्रमुख अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हेते.
कार्यक्रमाचे स्वागत लेझीम व ढोल तशाच्या गजरात करण्यात आले. यावेळी भोंगाळे यांच्या जीवन संघर्षावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. स्वामी विवेकानंद काव्य मंच तर्फे कविता सादर केली. प्रसिद्ध उद्योजक मयुर विखे-पाटील, प्रल्हाद इंगळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
श्री विनायक पतसंस्थेची स्थापना… स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत सर्व शाळांचे आणि योगेश एंटरप्राईझेस ग्रुपच्या कर्मचारी यांच्यासाठी श्री विनायक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेची घोषणा यावेळी करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या कर्मचाऱ्यांची मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी आणि आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असायला हवे, या संकल्पनेतून आम्ही या संस्थेची स्थापना करीत आहोत, अशा भावना यावेळी विनायक भोंगाळे यांनी व्यक्त केल्या. प्रतिक्रिया : ज्यांना आपले भविष्य घडवायचे असेल, तर आराम हराम आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय माणूस घडत नाही. माणूस घडल्याशिवाय समाज घडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने कष्ट करण्याची आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. - विनायक भोंगाळे, संस्थापक अध्यक्ष, एसव्हीएसपीएम. ***