शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०३ मे २०२४ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता होणाऱ्या या व्याख्यानांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक ०३ मे २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय ‘देशहित में पॉंच नए कानून’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक ०४ मे २०२४ रोजी प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक तुषार दामगुडे यांच्याशी ‘सांप्रतकालीन सामाजिक – राजकीय व्यवस्था व अवस्था’ या विषयावर ऋषिकेश ‘ऋषि’ मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधतील. रविवार, दिनांक ०५ मे २०२४ रोजी ‘भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील व्याख्यानाने एआरडीई, पुणे येथील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर व्याख्यानमालेतील अंतिम पुष्पाची गुंफण करतील.
विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी दररोज सायंकाळी ठीक ०६:४५ वाजता स्थानापन्न व्हावे, अशी संयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे.