शबनम न्युज | सातारा (वृत्तसंस्था)
राज्य शासन दिव्यांगांच्या प्रती संवदेशील असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांगांना सुलभ व सहज शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी जुन्या व नवीन योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानांतर्गत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई बोलत होते. या प्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषेदचे समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजनेचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. दिव्यांग स्वत:च्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून आणखीन जास्तीचा कोटा वाढवून घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तहसील, प्रांत कार्यालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे यासाठी उद्योग व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
निराधार योजनेची दिव्यांगांची प्रकरणे तातडीन मंजूर करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, दिव्यांगांना कार्यालयात हेलपाटे मारु लागू नये यासाठी दिव्यांगांपर्यंत पोहचून त्यांना विविध योजनांचा लाभही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिव्यांगांप्रती संवदेशील आहेत. दिव्यांगाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन दिव्यांगांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले जाईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.