शबनम न्युज | बारामती
“गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा करण्याची ही गेली ५० वर्षांपासूनची पद्धत आहेत. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचे वर्ष वेगळे आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते म्हणून आधीच भेटून जातो,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. दिवाळी पाडवा कार्यक्रमानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
बारामती मध्ये गोविंद बागेत गेल्या ५० वर्षांपासून दिवाळी पाडवा साजरा होतो. मात्र यावेळी हा दिवाळी पाडवा साजरा होत असताना अजित पवार उपस्थित राहणार कि नाही? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, बारामतीमध्ये असून सुद्धा अजित पवार या कार्यक्रमाला आले नाहीत.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी आलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचे वैशिष्ट्य आहे. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन पवार यांनी दिले.