शबनम न्युज | मुंबई
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत. यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. पण हे सरकार तरी आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. मुंबई-पुण्यात आजपर्यंत कधीही नव्हतं एवढं प्रदुषण अनुभवलंय. याबाबत काही तज्ज्ञांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की नियोजनशुन्य विकासकामांमुळे प्रदुषण वाढलंय. त्यामुळे सगळीकडे धुळधाण झाली होती. प्रदुषण पाहिल्यानंतर आपल्या असंवैधानिक सरकारने जाहीर केलं होतं की मुंबईतील रस्ते धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि प्रदुषण कमी झालं असावं.
मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात. त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती मागवली पाहिजे. आज जे मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून दुसऱ्याचं घर धुंडाळतात. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत गुवाहाटीचा चोरटेप्रकार त्या लोकांना सांगणार आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.