शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे, दि. १९: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ३२ गावात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यात्रेत महिला, विद्यार्थी, खेळाडू आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २२ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. मावळ तालुक्यात यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये २१ हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. तसेच ६ हजार ६२४ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला. यात्रेत ३ हजार २९० महिला, १ हजार ११२ विद्यार्थी, १०४ खेळाडू आणि १०२ स्थानिक कलाकार कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
तालुक्यात ३९५ ठिकाणी आरोग्य शिबाराचे आयोजन करुन क्षयरोगासाठी ७८ आणि सिकलसेल समस्येबाबत ६३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. १५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आयुष्मान योजना कार्ड वितरीत करण्यात आले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेद्वारे १५ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. १५ संगणकीकृत अभिलेख्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत नमुना – ‘८ अ’ चे उतारे वितरण करण्यात येत आहेत.
तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन माहिती घेत आहेत. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. आपल्या गावाताच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
यात्रा २० डिसेंबर रोजी थुगांव व मळवंडी ढोरे, २१ डिसेंबर रोजी येलघोल व डोणे, २२ डिसेंबर रोजी आढले बु व आढले खु आणि २३ डिसेंबर रोजी ओव्हाळे व दिवड गावात येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी केले आहे.