शबनम न्युज : पुणे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील ‘सत्य शोधक’ या चित्रपटातील अनेक प्रसंग वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आक्षेप हिंदू महासंघाने घेतला आहे.इतिहास संशोधकांच्या मदतीने हे प्रसंग तपासून बदलावेत, अशी मागणी हिंदू महासंघाने पुण्यात पत्रकाद्वारे केली आहे.
हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.’महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट हा महाराष्ट्रातील जातीयवाद आणखी वाढवणारा ठरणार आहे. फुले पती पत्नी चे पूर्ण सकारात्मक कार्य न दाखवता केवळ जातीय तेढ दाखवण्याचा उद्देश चित्रपट निर्मितीमागे आहे का ? ‘,असा प्रश्नही हिंदू महासंघाने विचारला आहे.
भगवान परशुराम यांच्या एकेरी उल्लेख असलेल्या पत्र या चित्रपटात दाखवले असताना मग महात्मा फुले यांनी मोहंमद पैगंबर आणि येशू यांच्या समर्थन केलेल्या कविता चित्रपटात का नाही दाखवल्या,ज्योतिबा फुले यांच्या कार्यात त्यांना मदत करणारे ब्राह्मण यातून गायबच केले आहेत,लग्नातून हाकलले गेल्याच्या प्रसंगात एका व्यक्ती च्या कृती वरून पूर्ण समाजाला दोष दिला जात आहे,विधवा केशकपन निश्चित होत होते पण ती काही परंपरा नव्हती…समाजाचा नियम नव्हता,शिवाजी महाराज गेल्यावर जवळ जवळ १५० वर्ष येथील समाज महाराजांचे कर्तृत्व विसरला होता.. नव्हे महाराजांनाच विसरला होता हे मान्य नाही,असे अनेक आक्षेप हिंदू महासंघाने घेतले आहेत.
‘श्रेय नामावलीत वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड यांची नावे वाचूनच चित्रपट मागील विचार लक्षात आले आहेत,’असेही महासंघाने म्हटले असून ‘शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्याची शरद पवार यांची सूचना म्हणजे लहानपणापासूनच जातीयवाद शिकवणे आहे’,अशी टीका या पत्रकात करण्यात आली आहे.