शबनम न्युज | मुंबई
“मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्यासाठी राजकीय प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते, यासाठी माझा सल्ला असेल की, त्यांनी लोकांच्या पंगतीत जेवण करावे, त्यांनी वेगळे जेवण केल्यास त्यांच्या जीवनात जुलाबाची औषध टाकले जाऊ शकते, पण पंगतीच्या जेवणात मोठ्या प्रमाणात औषध टाकले जाऊ शकत नाही. जर आंदोलनाचे नेतृत्व करणारा व्यक्ती आजारी पडून रुग्णलयात दाखल झाल्यास आंदोलन भरकटते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून काढलेली पदयात्रा आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे. सदर यात्रा लोणावळा येथे असून, त्यानंतर वाशी ते मुंबई येथे प्रजासत्ताक दिनी धडकणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईत येऊ नये, यासाठी सरकारकडून चर्चा करण्यात येत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना माध्यमांसमोर एक वेगळा सल्ला दिला आहे.