शबनम न्युज | बारामती
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत रंगणार आहे. परंतु या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला. हा तीढा सुटल्यावर जागावाटप केले जाईल, त्यामुळे कोणाला किती जागा मिळतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज मतदारांना आवाहन करताना, “मी जिथे उमेदवार जाहीर करेल, तिथे मीच उभा आहे,” असं समजून मतदान करा. असे आवाहन राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे, ते आज बारामतीत बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले. “माझी तुम्हाला विनंती आहे की, लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, त्या निवडणुकीत तुम्हाला मला पावती द्यायची असेल, तर बारामतीत जो बदल आणि जे काही काम चालले आहे, जे निर्णय मी विकासासाठी घेतले, ते लक्षात ठेवा. धाडस दाखवल्यावरच काम होत असतात, असे आवाहन अजित पवारांनी बारामती मतदारांना केले आहे.
“उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन, तिथे मी उभा आहे, असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. पण, तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.