शबनम न्युज | पुणे
काल पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी यावर टीका केली आहे. “ही गुंडगिरी आहे. लोकशाही मार्गाने एखादा कार्यक्रम होत असेल आणि तुम्ही गुंडांना पुढे करत असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो. हल्लेखोर काठ्या आणि दगड घेऊन तिथे आले होते. पुरेसे पोलीस तिथे नव्हते. जे काही ४०-५० पोलीस तिथे होते, ते लांबून तमाशा बघत होते, असे म्हणत रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
सदर कार्यक्रम हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच कार्यक्रमाला गालबोट लागलं. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी उपस्थित आयोजक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दगडफेकही झाली. या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांवरही हल्ला केला.
‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील’ असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज केलं. मला त्यांना विचारायचंय, ‘पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला कारणारेही कुत्रेच होते का? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.