शबनम न्यूज | मुंबई
प्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांचे आज दुःखद निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है..’ सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.
मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पंकज यांच्या कन्या नायाब उधास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत आणि हे तुम्हाला सांगत आहोत की पद्मश्री पंकज उधास यांचं निधन झालं. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.