शबनम न्युज | मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. अशातच याबाबत आता नवीन तारीख समोर आली असून 14 मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल असे समजते.
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागा वाटपासाठी वेगवान प्रयत्न केले जात आहे. भाजपने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर केली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या आघाडीत यंदा नवीन पक्ष सामील झाल्याने जागा वाटपासाठी उशीर होत असून, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीचे लवकरच बैठक होणार आहे.
दरम्यान, भाजपने देशभरातील आपल्या 195 उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी अद्याप महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या दोन दिवस महाराष्ट्रावर भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.