शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही प्रमुख विरोधी आघाड्यांच्या जागा वाटपाचा मुद्दा मोठा चर्चेत आला होता. कोणाला कुठली जागा मिळणार? याविषयी प्रचंड उत्सुकता होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमध्ये दोन्ही गट सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूला असताना उरलेले भाजपा व काँग्रेस यांच्यासह जागावाटप कसं केलं जाणार? याबाबत सर्वांना प्रश्न पडले होते. अखेर आज महाविकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांमध्ये जागावाटप नेमकी कसे ठरले? याची घोषणा केली आहे.
आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये शरद पवार ,उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जागावाटप नेमकं कसं ठरलंय? याची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार शिवसेना सर्वाधिक 21 जागा काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा लढवणार आहे. दरम्यान, गेला काही दिवसांपासून सांगलीत जागेवरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. या जागेवर उद्धव ठाकरेंनी आधीच ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानुसार ही जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडली आहे.
काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ मिळाले आहेत. तर शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण या जागा मिळाल्या आहेत.