शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तापकीर नगर, श्रीनगर या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा विषयी अनेक तक्रारी येत आहेत. कमी दाबाने पाणी येणे, अवेळी पाणी पुरवठा यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून तर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नियमितपणे पाणी पुरवठा होत नाही, सणासुदीच्या काळात तरी पुरेशा दाबाने पाणी नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, पाणीटाक्यांमधून तापकीर नगर, श्री नगर, शास्त्री नगर, ज्योतिबा नगर भागाला पाणीपुरवठा केला जातो. तेथील पाण्याची पातळी कमी झाली की पाणीपुरवठा विस्कळित होतो. मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पूर्ण दाबाने आणि नियमितपणे होणारा पाणी पुरवठ्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. त्या लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही विस्कळीतपणा कायम आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, सणासुदीच्या काळात तरी नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, नियमितपणे आणि उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे.
अमृत च्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याची पाईपलाईन जागोजागी फुटली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. तक्रार करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. आधीच कमी दाबाने पाणी पुरवठा त्यात दूषित पाणी मिळत असल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेकडे नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नाही दर पंधरा दिवसांनी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते, कधी दूषित तर कधी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. महापालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.