ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागाच्या छाप्यांबाबत शरद पवार यांची भाजपवर टीका
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग इत्यादींच्या छाप्यांबाबत पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. बिगर भाजपशासित राज्यांना अस्थिर करण्याचा भाजपचा डाव स्पष्टपणे दिसतो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेली छापेमारी, चौकशांमुळे राज्य सरकार अस्थिर होणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. इतकेच नव्हे, तर जनतेच्या पाठिंब्यावर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
याप्रसंगी शरद पवार म्हणाले कि,, सत्ता गेल्याचे दु:ख देवेंद्र फडणवीस यांना सहन होत नाही. हे सरकार टिकणार नाही असे म्हणणाऱ्या फडणविसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते. ‘मी पुन्हा येईन’ याच्याशी ते सुसंगत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होईल की नाही, हे आत्ताच सांगू शकणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.