आता लढायचं कसं ”आमचा ढाण्या वाघ गेला हो”
राज्यभरातील रेशन दुकानदारांकडून गजानन बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.१४ फेब्रुवारी) :- गेली सतरा वर्षे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्या साठी जीवाचे रान केले. त्यासाठी मोठा लढा उभा केला. त्या लढ्याला यशही आले. त्यातून राज्यभरातील ५५ हजार रेशन दुकानदारांना सुखाचा घास मिळवून दिला. असे आक्रमक नेतृत्व आज काळाने आपल्यातून हिरावून नेलं. त्यांच्या अकाली जाण्याने संघटना खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे. आता लढायचं कसं ”आमचा ढाण्या वाघ गेला हो”, अशा भावपूर्व शब्दात पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील रेशन दुकानदारांनी स्व. गजाननजी बाबर यांना अश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शिवसनेचे माजी खासदार तथा ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष स्व. गजाननजी बाबर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसरात रविवारी (दि. १३) रोजी दुपारी १२.३० वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डी सी कटारिया, उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मागीराज जाटव, पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, माजी नगरसेवक मधुकर बाबर, ऑल इंडिया महासंघाचे काका देशमुख, सुरज बाबर, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे उपाध्यक्ष डोळसे पाटील, सेक्रेटरी बाबुराव ममाने, कराड-सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील, ठाण्याचे शंकर सुरवसे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष जयराम मेदणे, अहमदनगरचे देविदास देसाई, सातारचे आप्पासाहेब तोडकरी, नागपूरचे संजय पाटील, जळगावचे मदेश शेलार, केजचे तालुकाध्यक्ष धावरे, पुणे जिल्हाध्यक्ष बाबा पंडित, सिंधुदुर्गचे उमेश धुरी, सांगलीचे दीपक उपाध्ये, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अशोक एडके, कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप तुपे, कापसे महाराज, सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन पेंटर, बीड जिल्हाध्यक्ष के के खान, वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, नागपूर जिल्हाध्यक्ष सुभाष मुसळे, नाशिक जिल्हाध्यक्ष वंदन बागुल, अहमदनगरचे देविदास देसाई, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अप्पा शेटे, मोहन बाबर, चिंतामणी सोंडकर, शुभांगीताई आणि राज्यभरातून सर्व जिल्यातील रास्त भाव धान्य दुकानदार आणि संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी या शोकसभेस उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष डी सी कटारिया श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, गजानन बाबर यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता पुन्हा होणे नाही. कायद्याच्या कचाट्यात न अडकता सनदशीर मार्गाने त्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाबर साहेबांनी परवानाधारकांच्या हक्कासाठी सुरु केलेला लढा आता तुम्हाला पुढे न्यायचा आहे; त्यासाठी एकजुटीने पुढे या. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
माजी नगरेसवक मधुकर बाबर म्हणाले, गजानन बाबर हे एक अनोखं रसायन होतं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ब्रीद त्यांनी शेवटपर्यंत पाळले. दुकानदारांच्या हक्कासाठी त्यांनी राज्यभर प्रवास केला. भ्रष्टाचाराला त्यांनी कधीच खतपाणी घातले नाही. तत्कालीन सरकारचा त्यावेळी त्यांनी रोष पत्करला. परंतु ते शेवटपर्यंत नमले नाहीत. मी आजारातून बरा होईल, असा त्यांना शेवटपर्यंत विश्वास होता. संघटना म्हणून एकत्र रहा. बाबरसाहेब नाहीत म्हणून काय झालं, सामुहिक ताकद तयार करा, बाबर साहेबांना तेच अपेक्षित होतं.
खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, बाबरसाहेबांना शेवटपर्यंत राज्यातील सर्व संघटना एकाच छताखाली असायला हव्यात, असे अभिप्रेत होते. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी समन्वयाने काम करावे. राज्यात सहा विभागीय अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. संघटना ऑनलाईन बनली आहे. त्यामुळे संघटनेत पारदर्शक कारभार होत आहे. बाबर साहेबांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, तरच सरकार आपल्या मागण्या मान्य करील; अन्यथा संघटन अडचणीत येऊ शकते.
सूत्रसंचालन शंकरराव आतकरे यांनी तर, बाबर परिवाराच्या वतीने मोहन बाबर यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, सभासद, स्वस्त धान्य दुकानदार यांचे मनापासुन आभार मानले.